बार्शी : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज श्री भगवंत प्रकट दिनानिमित्त बार्शी येथे उपस्थित होते. या दौऱ्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना केलेल्या एका सूचक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
श्री भगवंताच्या प्रकट दिनानिमित्त बार्शीत आलेल्या मुख्यमंत्र्यांनी देवस्थानात दर्शन घेत समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी देवस्थानाच्या विकासासाठी राजाभाऊंनी तयार केलेल्या आराखड्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली.
यानंतर माध्यम प्रतिनिधींनी आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजेंद्र राऊत यांना संधी मिळणार का, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत अंतिम निर्णय पक्षाची संसदीय समिती घेत असते. मात्र, “इतकंच सांगतो की, राजाभाऊ राऊत यांना भविष्य आहे,” असे सूचक विधान त्यांनी केले.
मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे राजाभाऊंच्या संभाव्य उमेदवारीबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले असून, आगामी राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्त्वात बार्शीमध्ये भाजपला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून त्यांना संधी दिली जाईल अशा शक्यता वर्तवली जात आहे.







