काही तासांत बैल व नुकसानभरपाई उपलब्ध
लातूर : जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्या कुटुंबावर ओढवलेल्या संकटाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने मदतीचे निर्देश दिल्यानंतर अवघ्या काही तासांत त्यांना नवीन बैल आणि दगावलेल्या बैलाच्या नुकसानभरपाईची रक्कम उपलब्ध झाली आहे. (CM Devendra Fadnavis provides immediate relief to farmer in Latur)
शुक्रवारी (५ जून) झालेल्या वादळी पावसादरम्यान वीज पडून काशिनाथ गायकवाड यांच्या बैलाचा मृत्यू झाला होता. शेतीची कामे रखडू नयेत म्हणून त्यांना पत्नी हौसाबाई यांना जोखडाला जुंपून शेतीची कामे करावी लागली. या घटनेची माहिती सोशल मिडीयातून समोर आल्यानंतर ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचली.
घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी लातूर जिल्हाधिकारी तसेच संबंधित प्रशासकीय यंत्रणांना तात्काळ मदत करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर तहसील प्रशासन, पशुसंवर्धन विभाग आणि कृषी विभागातील अधिकारी त्वरित गायकवाड यांच्या शेतावर पोहोचले.
पशुसंवर्धन विभागाने विशेष प्रयत्न करून गायकवाड कुटुंबासाठी नवीन बैल उपलब्ध करून दिला. जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा बैल थेट शेतकरी कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आला. तसेच वीज पडून मृत्यू झालेल्या बैलाच्या नुकसानभरपाईची रक्कमही मंजूर करण्यात आली.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या तातडीच्या आणि संवेदनशील हस्तक्षेपामुळे संकटात सापडलेल्या गायकवाड कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. याबद्दल काशिनाथ गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत.
या घटनेमुळे शासनाची यंत्रणा आणि प्रशासन वेळेत सक्रिय झाल्यास अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळू शकते, याचे उदाहरण पुन्हा एकदा समोर आले आहे.







