धाराशिव : तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या माध्यमातून चालविण्यात येणारे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे मराठवाड्यासह धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.
तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी या संदर्भात सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. यापूर्वी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी हे महाविद्यालय शासकीय करण्याचा निर्णय घेतला होता, त्यास आज मंत्रीमंडळाने अधिकृत मान्यता दिली.
या निर्णयामुळे आता विद्यार्थ्यांना शासकीय शुल्कामध्ये अभियांत्रिकी शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व होतकरू विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या शिक्षणाचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.तसेच महाविद्यालयाच्या शासकीयकरणामुळे शैक्षणिक दर्जा उंचावण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या निर्णयामुळे धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यातील शैक्षणिक व आर्थिक विकासाला चालना मिळणार असल्याचे मानले जात आहे.





