कृषी विभागाची धडक कारवाई; 7.52 लाखांचे बोगस बियाणे जप्त, हजारो शेतकरी फसवणुकीपासून बचावले
बार्शी : खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बोगस बियाणे विक्रेत्यांविरोधात तालुका कृषी विभागाने मोठी धडक कारवाई करत तब्बल 7 लाख 52 हजार 640 रुपयांचे बनावट उडीद बियाणे जप्त केले. या कारवाईमुळेबार्शीत बनावट उडीद बियाणे रॅकेटचा पर्दाफाश हजारो शेतकरी संभाव्य आर्थिक फसवणूक आणि पिकांच्या मोठ्या नुकसानीपासून वाचल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला दि. 26 मे 2026 रोजी दुपारी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास बार्शी शहरात बोगस उडीद बियाणे विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर कृषी विभागाच्या पथकाने तत्काळ हालचाली करत स्वराज कॉलनी, बार्शी येथील एका गोडाऊनवर छापा टाकला.
या कारवाईत शेळगाव (ता. परांडा, जि. धाराशिव) येथील स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्राचे प्रोप्रायटर रत्नाकर रघुनाथ कोले यांनी विक्रीसाठी आणलेल्या निर्मल सीड्स प्रा. लि. कंपनीच्या “NUL 7 (विश्वास)” या उडीद बियाण्यांच्या नावाने बनावट आणि हुबेहूब नक्कल केलेल्या बॅगा आढळून आल्या.
पथकाने गोडाऊनमधून 216 बॅग जप्त केल्या असून यापूर्वी 168 बॅग विक्री झाल्याचेही प्राथमिक तपासात समोर आले आहे. एकूण 384 बॅग (प्रत्येकी 5 किलो) असा सुमारे 7,52,640 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे आणि उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले, विभागीय गुणवत्ता नियंत्रण अधिकारी अतुल जाधव, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी बाळू बागल, गुणवत्ता नियंत्रण अधिकारी किशोर अंधारे, सहाय्यक कृषी अधिकारी गणेश पाटील, निर्मल कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी सोमनाथ भीमशेट्टी तसेच बार्शी शहर पोलीस स्टेशनचे प्रतिनिधी सचिन देशमुख सहभागी होते.
दरम्यान, या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
या कारवाईनंतर आता कृषी विभाग आणि पोलिसांकडून या बनावट बियाण्यांची यापूर्वी किती शेतकऱ्यांना विक्री झाली आहे, इतर तालुक्यांमध्येही अशा बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला होता का, तसेच या मागे मोठे रॅकेट कार्यरत आहे का याचा सखोल तपास होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात असून कृषी विभागाने शेतकऱ्यांना अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करण्याचे आवाहन केले आहे.







