भुम : तालुक्यातील बावी येथे बदनामीच्या त्रासाला कंटाळून एका ४१ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी भुम पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास काशीनाथ भोसले (वय ४१, रा. अंबिका नगर, बावी ता. भुम जि. धाराशिव) यांनी दि. १८ मे २०२६ रोजी सायंकाळी बावी शिवारातील विश्वनाथ भोसले यांच्या शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
या प्रकरणी मयत व्यक्तीचे सुपुत्र प्रसाद विलास भोसले (वय २२) यांनी दि. २५ मे रोजी भुम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, आरोपी विश्वनाथ दिगंबर भोसले, लालू प्रकाश भोसले, प्रकाश विश्वनाथ भोसले, बाबू मारुती पिंपळे आणि उमेश रोहीदास राऊत (सर्व रा. बावी ता. भुम जि. धाराशिव) यांनी विलास भोसले हे तळ्यातील पाण्याची मोटार घेऊन जात असल्याचे छायाचित्रीकरण केले. तसेच हे चित्रण इतरांना दाखवून त्यांनी मोटार चोरी केल्याची बदनामी केली. या मानसिक त्रासाला कंटाळून विलास भोसले यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या फिर्यादीवरून भुम पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०८, ३५६, ३(५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.








