सोलापूरकरांसाठी आजचा आनंदाचा दिवस आहे. सोलापुरात विमानसेवा सुरू झाल्यामुळे उद्योगपती मोठी गुंतवणूक करतील. सोलापुरात आयटी हब उभारले जाईल तसेच शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी १ हजार कोटी दिले जातील, अशा मोठ्या घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या.(Solapur Mumbai flight service inaugurated by Chief Minister Devendra Fadnavis)
सोलापूर ते मुंबई विमानसेवेचा आज प्रारंभ झाला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला फडणवीस यांच्याह केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्ह्यातील आमदार खासदार आदी नेते आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले,एखाद्या जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर संबंधित ठिकाणी हवाई सेवा महत्त्वाची असते. सोलापूरला हवाई सेवा झाल्याने त्यांचा संपर्क थेट मुंबईशी आणि पर्यायाने देश-जगाशी आला आहे. एकदा निर्यात सुरू झाली की आपण जगाशी जोडले जातो. त्यामुळे सोलापूरकरांसाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे, असे फडणवीस म्हणाले. सोलापूरमध्ये विमानतळ होते मात्र ते चालू नव्हते. अनेक वर्षापासून सोलापुरातील हवाई सेवा सुरू होऊ शकत नव्हती. आम्ही विचार केला की सोलापूर सारखी महत्त्वाचे विमान सेवा सुरू होण्यासाठी प्रयत्न करायला हवा.
सोलापूरला विमान सेवा सुरू झाल्याने भाविकांची संख्या तीन पटींनी वाढेल
सोलापूर जवळ पंढरपूरचा पांडुरंग, स्वामी समर्थ, तुळजाभवानी यांच्यासारखी मंदिर आहेत. त्यामुळे विमानतळ सुरू झाले तर भक्तांचा ओघ वाढेल. सिद्धेश्वर साखर कारखान्याची एक चिमणी हलवल्यामुळे सोलापूरचा विकास आता वेगाने होणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी सोलापूर विमानतळाचे नूतनीकरण केले. आम्ही सांगितले होते की हे मोदी सरकार आहे, निश्चित विमान सेवा सुरू होईल. मोदीजींनी विमान सेवाचे महत्त्व समजून घेतले आहे. सोलापूरसाठी आम्ही गॅप फंडिंग दिले आहे. जेव्हा तुम्ही मुंबईला कनेक्ट होता, तेव्हा संपूर्ण देशाला कनेक्ट होता. सोलापूर मुंबई विमान सेवेसाठी सरकारने तत्काळ १८ कोटी रुपये दिले, असे फडणवीस यांनी सांगितले.
आयटी पार्क उभारणार, पाईप लाईनसाठी १ हजार कोटी देणार
मी आयटी पार्क संदर्भात सांगितले होते मात्र आयटी पार्क सुरू करण्यासाठी विमान सेवा महत्त्वाची होती. आता विमानसेवा सुरू झाल्याने त्यासंदर्भात लवकर पावले उचलण्यात येतील. आम्ही सोलापुरात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध करणार आहोत. सोलापूर शहरासाठी पाणी पाईपलाईन साठी एक हजार रुपये कोटी रुपये देणार आहोत, पाईपलाईन पूर्ण झाली की सोलापूर शहरालाही इतर शहराप्रमाणे नळाने पाणी येईल, असे फडणवीस म्हणाले.









