मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
धाराशिव : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य स्मारकाची अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा आता संपली आहे. धाराशिव शहरातील शासकीय दूध शीतकरण केंद्राची एक एकर जागा या स्मारकासाठी विनामूल्य देण्याचा अधिकृत आदेश जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी निर्गमित केला आहे. विशेष म्हणजे, या जागेसाठी द्यावे लागणारे सुमारे २ कोटी ८ लाख रुपयांचे मूल्य शासनाने माफ केल्याने नगरपरिषदेचीही आर्थिक बचत झाली आहे. त्यामुळे भव्य स्मारक उभारणीचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला असल्याची माहिती मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
धाराशिव शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा आणि भव्य स्मारक उभारण्यात यावे अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्यानुसार या स्मारकाच्या उभारणीसाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून यापूर्वीच आपण ₹ १.५० कोटी निधी मंजूरही करवून घेतला आहे. पालिका निवडणुकीच्या अगोदर शहरात अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याचे अभिवचनही आपण वचननाम्याच्या माध्यमातून शहरवासीयांना दिले होते. तत्कालीन महसूलमंत्री ना.श्री. राधाकृष्णजी विखे पाटील यांनी ऑगस्ट महिन्यात जागा हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला होता मात्र त्यासाठी नगरपालिकेला शासनाकडे जागेच्या मोबदल्यात बाजारभावाप्रमाणे ₹ २ कोटी ८ लाख भरणे आवश्यक होते. पालिकेकडे निधी नसल्याने हा विषय प्रलंबित होता. पालिकेची आर्थिक स्थिती पाहता ही रक्कम माफ करण्याची विनंती आपण शासनाकडे केली होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर सकारात्मक निर्णय होऊन ९ जानेवारी २०२६ रोजी महसूल व वन विभागाने या जागेला ‘भोगवटादार वर्ग-२’ अंतर्गत महसूलमुक्त आणि मूल्यरहित तत्वानुसार मंजुरी देत जागा विनामुल्य देण्याचा निर्णय घेतला होता.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार जिल्हाधिकारी यांनी धाराशिव शहरातील शीतकरण केंद्राच्या अखत्यारीतील असलेली १ एकर जागा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी नगरपरिषदेकडे हस्तांतरित केली आहे. सोमवारी तसा अधिकृत आदेश त्यांनी जारी केला आहे. त्याचबरोबर या जागेच्या चतुःसिमाही निश्चित करण्यात आल्या असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे. या जागेवर भव्य स्मारक, आकर्षक उद्यान आणि सुसज्ज अशी अभ्यासिका उभारण्यात येणार आहे. स्मारकामध्ये केवळ अण्णाभाऊंचा पूर्णाकृती पुतळाच नसेल, तर त्यासोबतच सुसज्ज बाग बगीचा परिसराच्या सुशोभीकरणासाठी आकर्षक उद्यानही विकसित केले जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी अण्णाभाऊंच्या साहित्यावर आधारित अभ्यास केंद्र हे या स्मारकाचे आणखी एक वैशिष्ट्य असणार आहे. लोकशाहीर अण्णाभाऊंच्या विचारांची आणि सामाजिक लढ्याची स्मृती जिवंत ठेवणारे हे जिल्ह्यातील पहिले आणि मोठे स्मारक ठरणार आहे.
व्यापक लोकसहभागाची कृती समिती : आमदार पाटील
धाराशिव शहरात साकारण्यात येणाऱ्या साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊंच्या भव्य स्मारकासाठी व्यापक कृती समिती गठित करण्यात येणार आहे. त्याची नोंदणी करून बँकेत खाते उघडले जाईल. पारदर्शकता रहावी यासाठी केवळ धनादेशाद्वारे थेट बँक खात्यात लोकसहभाग स्वीकारण्यात येईल. समाजबांधवांसह विविध समाज घटकातील नागरिकांच्या सहभागाने जिल्ह्यातील एक भव्य आणि ऐतिहासिक स्मारक उभारण्याचा आपला प्रयत्न आहे. सर्वप्रथम आपण.स्वतः एक लाख रुपयांचा व्यक्तिगत सहभाग लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी देत असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.






