धाराशिव जिल्ह्यात खरीप २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या अभूतपूर्व नुकसानीमुळे ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा. तसेच शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यात यावी अशी मागणी तुळजापूरचे आमदार तथा राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. (MLA Ranajagjitsinha Patil)
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात आमदार पाटील म्हणाले की, धाराशिव जिल्ह्यात खरीप २०२५ हंगामात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सतत झालेल्या अभूतपूर्व अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. ऑगस्ट महिन्यात २१ महसूल मंडळात अतिवृष्टी, तर सप्टेंबर महिन्यात ७ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून उर्वरित मंडळांमध्ये सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पिके पाण्यात बुडाली आहेत, अनेक ठिकाणी शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. काही ठिकाणी मानवी जीवितहानी, जनावरांचा मृत्यू तसेच घरांची पडझड झाली असून शेतकरी व सर्वसामान्य नागरिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
‘ओला दुष्काळ’ हा शब्द तांत्रिकदृष्ट्या महसूल नियमावलीत (म्हणजेच Maharashtra Land Revenue Code किंवा Manual of Drought Relief) नसला तरी जनतेची भावना ही जिल्ह्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा अशी आहे. जिल्ह्यातील जनतेच्या वतीने आपणास नम्र विनंती आहे की, शासनाने धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगामातील ही आणीबाणीची परिस्थिती पाहता नैसर्गिक आपत्तीच्या या काळात विशेष उपाययोजना राबवून मदत जाहीर करावी, पंचनामे तातडीने पूर्ण करून आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी पत्रात करण्यात आली आहे.








