मुंबई : महाराष्ट्रातील रखडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे. राज्यातील ५० टक्के आरक्षणाची मर्यादा न ओलांडलेल्या १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. (Maharashtra ZP Election Date Declared)
राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होणार असून, त्यासाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. मतदानानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
दरम्यान, ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या राज्यातील उर्वरित २० जिल्हा परिषदांच्या निवडणुका नंतर घेण्यात येणार आहेत. या जिल्हा परिषदांमधील आरक्षणासंबंधीचा प्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने त्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
पहिल्या टप्प्यात ‘या’ ठिकाणी होणार निवडणूक :
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये निवडणुका होणार आहेत.
यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले होते. मात्र, वेळेअभावी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पूर्ण करणे शक्य नसल्याने निवडणूक आयोगाने सोमवारी (दि. १२ जानेवारी) सर्वोच्च न्यायालयात धाव घेत मुदतवाढीची मागणी केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने १५ फेब्रुवारीपर्यंत निवडणुका घेण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.





