धाराशिव : जिल्ह्यासाठी आणि विशेषतः श्री क्षेत्र तुळजापूरसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत तुळजापूर येथे “उमेद मॉल (जिल्हा विक्री केंद्र)” साकारण्यात येणार आहे. महिला स्वयं सहाय्यता समूहांच्या वस्तू व उत्पादनांना हक्काची, कायमस्वरूपी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासनाने पहिल्या टप्प्यात १३ जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल उभारण्याचा निर्णय घेतला असून, त्यामध्ये धाराशिव जिल्ह्याचा समावेश झाला आहे. याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.
या निर्णयासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात ठामपणे मागणी मांडली होती. तुळजापूरसारख्या धार्मिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी उमेद मॉल उभारल्यास ग्रामीण महिलांना मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ उपलब्ध होईल, असा मुद्दा त्यांनी शासनासमोर प्रभावीपणे मांडला होता. त्यांच्या या मागणीला राज्य शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आज हा निर्णय प्रत्यक्षात आला आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची अंमलबजावणी राज्यातील ३४ जिल्हे व ३५१ तालुक्यांमध्ये सुरू आहे. या अभियानांतर्गत लाखो महिला स्वयं सहाय्यता समूहांच्या माध्यमातून शेतीपूरक उद्योग, अन्नप्रक्रिया, हस्तकला, कापड, मसाले, पापड, लोणची, सेंद्रिय उत्पादने, हस्तनिर्मित वस्तू अशा विविध लघुउद्योगांमध्ये कार्यरत आहेत. या महिलांनी तयार केलेल्या गुणवत्तापूर्ण वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी “महालक्ष्मी सरस” प्रदर्शन, जिल्हा व विभागस्तरीय सरस मेळावे, आठवडी बाजारातील स्टॉल तसेच “उमेदमार्ट” ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि अमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर नोंदणी करून विक्रीची संधी देण्यात येत आहे.
तथापि, महिलांच्या उत्पादनांसाठी कायमस्वरूपी, विश्वासार्ह आणि मोठ्या प्रमाणावर विक्री होईल अशी हक्काची बाजारपेठ उभारण्याची गरज लक्षात घेऊन दि. २९ जुलै २०२५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पहिल्या टप्प्यात १३ जिल्ह्यांमध्ये “उमेद मॉल (जिल्हा विक्री केंद्र)” उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार संदर्भित शासन निर्णय निर्गमित झाला असून, त्यातील एक महत्त्वाचे केंद्र म्हणून तुळजापूरची निवड करण्यात आली आहे.
तुळजापूर हे आई तुळजाभवानी देवीचे प्रमुख तीर्थक्षेत्र असून दरवर्षी लाखो भाविक देश-विदेशातून दर्शनासाठी येथे येतात. या भाविकांसाठी महिलांनी तयार केलेली स्थानिक, दर्जेदार आणि पारंपरिक उत्पादने उपलब्ध करून देण्याची मोठी संधी उमेद मॉलमुळे निर्माण होणार आहे. यामुळे महिला बचत गटांच्या उत्पादनांना थेट ग्राहक मिळणार असून त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्यास मदत होईल.
एकूणच, तुळजापूर येथे उमेद मॉल उभारण्याचा निर्णय हा महिला सक्षमीकरण, ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरण आणि पर्यटनाशी जोडलेला विकास साधणारा ठरणार आहे. धाराशिव जिल्ह्यासाठी हा निर्णय विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरेल, यात शंका नाही.






