धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टीमुळे पिकांसह गावांमधील पायाभूत सुविधांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे आणि पायाभूत सुविधांच्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिले होते. या पंचनाम्यांचे जाहीर वाचन गावागावात ग्रामसभाघेऊन करण्यात यावे तसेच पायाभूत सुविधांची मदत मिळवण्यासठी ग्रामसभेत प्राधान्यक्रम ठरवून ठराव करण्यात यावे असे निर्देश आ. पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिले होते. परिणामी आजपासून धाराशिव जिल्ह्यात विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे.(MLA Ranajagjitsinha Patil)
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, की जिल्ह्यात पिकांसह पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत. पूल खराब झाले आहे, वीज पुरवठा करणारे पोल, डीपी कोसळ ली आहे, अनेक ठिकाणी पाणीपुरवठा लाईन विस्कळीत झाल्या आहेत.पायाभूत सुविधांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. हि मदत मिळवण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावाने अतिनिकडीच्या कामांचा प्राधान्यक्रम ग्रामसभेत ठराव करावा असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
गावागावात पंचनाम्याचे वाचन
नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्यात आले आहेत. या पंचनाम्याच्या याद्या प्रत्येक ग्रामपंचायतीत उपलब्ध करून देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पंचनाम्यात नुकसानीचे सविस्तर वर्णन असेल. गावागावात आजपासून होणाऱ्या ग्रामसभांमध्ये पंचनामयाचे जाहीर वाचन केले जाईल. पंचनाम्याकडे सर्वांनी बारकाईने लक्ष द्यावे, त्यात दुरुस्ती असल्यास, पंचनाम्यात आवश्यक दुरुस्ती करून घ्यावी. या पंचनाम्यांमध्ये पायाभूत सुविधांचे नुकसानही योग्यप्रकारे नोंदवून घ्यावे, कुठलीही बाब पंचनाम्यात नोंदवण्याची राहून जाऊ नये आणि कोणीही या शासनाच्या मदतीपासून वंचीत राहणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नागरिकांना केले.
पशुधनासाठी मदत
दगावलेली, वाहून गेलेली जनावरं यांच्या बाबतीत जी मर्यादा होती ती आता सरकारने काढली आहे. परिणामी जनावरे वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना मोठी मदत मिळणार आहे. सर्वच पशुधनाला सरसकट मदत केली जाणार आहे.
विहीरीचे नुकसान झाले असल्यास आणि जमीन खरवडून गेली असल्यास मदत
विहिरीत पुरामुळे गाळ आला असेल त्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी ३० हजारांची मदत दिली जाईल. जमीन खचली असेल, खरडून गेली असेल तर अशा नुकसानीसाठी ४७ हजार रुपये हेक्टरी अनुदान शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. ३ लाखापर्यंत जमीन दुरुस्तीसाठी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मदत मिळणार आहे.
पडझड झालेल्या घरांसाठी वेगळी मदत
पुराच्या तडाख्यात अनेक ठिकाणी पुराचे पाणी घरांमध्ये शिरले आहे. अंशतः घर पडलेली असेल तरी मदत मिळेल, अतिक्रमित जागेवर असलेल्या घरांमध्ये पाणी शिरलं असेल तर त्यासाठी देखील मदत दिली जाईल.
आपापल्या गावांमध्ये ग्रामसभांना उपस्थित राहा
नागरिकांनी आपापल्या गावांमध्ये आयोजित विशेष ग्रामसभांना आवर्जून उपस्थित राहावे, आपापल्या नावापुढे काय नुकसान लिहिलेले आहे याची खातरजमा करा. त्यात चूक असेल तर त्याची लेखी तक्रार द्या, पोच घ्या आणि नुकसानीची नोंद करून घ्या. या प्रक्रियेत अडचण आल्यास आम्हाला संपर्क करा असे आवाहन यावेळी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केले आहे.






