गरजू घटकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा आमदार पाटील यांचे आवाहन
जिल्ह्यातील हजारो युवक स्वयंरोजगारातून यशस्वी उद्योजक म्हणून पुढे येत आहेत. त्या माध्यमातून शेकडो कुटुंबियांना मोठा आर्थिक आधार लाभला आहे. समाजातील इतर गरजू घटकांनीही राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन मित्र संस्थेचे उपाध्यक्ष आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आज येथे केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधत तुळजापूर येथील तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.(Tuljapur employment fair)
भविष्यातील मोठ्या संधी पदरात पाडून घेण्यासाठी युवक आणि युवतींनी नोकरीचा अनुभव घेणे गरजेचे आहे. ज्यामुळे आपल्यामध्ये व्यवसायाची कौशल्य निर्माण होतील, जेणेकरून त्यातून आपले कुटुंबही आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल. पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंरोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगाराच्या अनेक संधी युवकांसमोर खुल्या करून देण्यात आल्या आहेत. या उपक्रमामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होण्यास मदत झाली असून भविष्यात असे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविले जातील, असा विश्वास यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.
५६४ उमेदवारांनी दिल्या मुलाखती
तुळजापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झालेल्या या उपक्रमामध्ये शेकडो युवक-युवतींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. या मेळाव्यास दहावी, बारावी, आय.टी.आय., डिप्लोमा, पदवीधर, तसेच अभियांत्रिकी, फार्मसी आणि तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. राज्यभरातील ३२ हून अधिक मान्यताप्राप्त कंपन्यांनी या रोजगार मेळाव्यात सहभाग घेतला आणि या मेळाव्यातून ५६४ उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. या मेळाव्यात अनेक नामवंत उद्योजक व एचआर प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, तहसीलदार अरविंद बोळंगे, जिल्हा कौशल्य विभाग सहाय्यक आयुक्त संजय गुरव, जिल्हा प्रशिक्षण अधिकारी प्रवीण आवताडे, तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजनकर, तसेच तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांची प्रमुख उपस्थिती होती