मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाक घोष यांची माहिती
धाराशिव : गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात एचपीव्ही (HPV) लसीकरणाची विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, ९ ते १४ वयोगटातील तरुणींना पुढील तीन महिन्यांत ही लस मोफत देण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील क्षय रुग्णांना विशेष पोषण कीट देण्याचा उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी सोमवारी (दि.९) पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सोमवारी पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर, आयुष्यमान कार्ड, आभा कार्ड नोंदणी व शासकीय योजनांची माहिती देणारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात डॉ. घोष यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अनंत कुंभार, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनुप शेंगुलवार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रवी खंदारे, जलसंधारण अधिकारी राऊळ, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय वाघज यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी संजय वाघज यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांची सविस्तर माहिती दिली. बांधकाम विभागाच्या तीन योजनांमधून यावर्षी दीडशेहून अधिक विकासकामे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांनी सांगितले की, जिल्ह्यात HPV लस देण्यासाठी १६ हजार ५०० मुलींची यादी तयार करण्यात आली आहे. प्रत्येकी सुमारे चार हजार रुपये किंमतीची ही लस मुलींना मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच जिल्ह्यात संपूर्णता अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत असून आरोग्य आणि शिक्षण विभागाकडून हे अभियान यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत, असेही त्यांनी सांगितले. सध्या जिल्ह्यात आरोग्य विभागाची ३५३ कोटी रुपयांची ९४ कामे सुरू असून त्यामध्ये जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच इतर रुग्णालयांच्या इमारतींची कामे सुरू असल्याचे हरिदास यांनी स्पष्ट केले. गुणवत्ता आश्वासक मानकांमध्ये यावर्षी धाराशिव जिल्हा राज्यात पहिला येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
याशिवाय धाराशिव जिल्ह्यात आतापर्यंत १५ लाख २६ हजार २१० लाभार्थ्यांपैकी ७ लाख ५१ हजार ७८७ लाभार्थ्यांचे आयुष्यमान कार्ड काढण्यात आले असून या योजनेत धाराशिव जिल्हा राज्यात १३ व्या क्रमांकावर आहे. तर वय वंदन योजनेत जिल्हा राज्यात सहाव्या क्रमांकावर असल्याची माहितीही त्यांनी दिली. यावेळी ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनुप शेंगुलवार यांनी जिल्ह्यातील घरकुल योजनांच्या कामांची सद्यस्थिती सविस्तरपणे मांडली.








