नुकसान अभूतपूर्व आहे. पिक कापणी प्रयोगानंतरही उत्पन्न अत्यल्प असल्याचेच स्पष्ट होणार आहे. प्रशासनाला तशा आवर्जून सूचनाही देण्यात आल्या आहेत. पिकविम्याच्या माध्यमातून मोठी आर्थिक मदत नुकसान भरपाई मिळणार आहेच. मात्र त्यासाठी पीककापणी प्रयोगाबाबत आपण अधिक सतर्क राहायला हवे असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.(MLA Ranajagjitsinha Patil on Crop Cutting Experiment)
पीकविमा आणि नुकसान भरपाई बाबत काही गैरसमज जाणीवपूर्वक पसरवले जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी बांधवांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. तो दूर होण्यासाठी पिक कापणी प्रयोगाबाबत अधिक स्पष्टता येणे आवश्यक आहे. एका मंडळात एका पिकाचे एकूण बारा पिक कापणी प्रयोग होणार आहेत.सध्या जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची व्याप्ती पाहता पीक कापणी प्रयोग व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काढलेले उत्पादन हे उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी असणारा आहे.त्यामुळे निकषानुसार याची उंबरठा उत्पन्नासोबत तुलना केल्यावर मोठया प्रमाणात नुकसान झालेचे स्पष्ट होणार असल्याने मोठी नुकसान भरपाई मिळणार आहे.सदर नुकसान भरपाई मिळताना मंडळातील सर्व शेतकरी बांधवांना एकसारखी मिळणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे ओढवलेल्या नुकसानीपोटी सोयाबीन, आदी पिकांसाठी (खरीप २०२५ व रब्बी २०२५-२६) पिक कापणी प्रयोग(५०%) आणि उपग्रह किंवा ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे(५०%) भारांकन पकडून उत्पादकता निश्चित केली जाणार आहे.अशा प्रकारे उंबरठा उत्पन्नाच्या तुलनेत झालेले नुकसान पाहून भरपाई दिली जाते.आधुनिक तंत्रज्ञान वापरून केले जाणारे प्रयोग हे केंद्र स्तरावरून केले जाणार आहेत तर पीक कापणी प्रयोग आपल्या उपस्थितीत. त्यामुळे पिक कापणी प्रयोग करताना ते अचूक होणे आवश्यक असून शेतकरी बांधवांनी त्याची अधिक गांभीर्याने काळजी घ्यावी असेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
आता शेतकरी किंवा गावातील सजग नागरिक या नात्याने आपली जबाबदारी मोठी आहे.पिक कापणी प्रयोग व्यवस्थित करून घेण्याचे काम आपल्याला करावे लागणार आहे. प्रशासनाला याबाबत आवर्जून सूचना देण्यात आल्या आहेतच. शासनाकडून मिळणारे अनुदान किंवा मदत तुलनेने विम्याच्या माध्यमातून मिळणाऱ्या मदतीपेक्षा कमीच राहते. आत्ताच्या घडीला उत्पादन अत्यल्प आहे. हे कोणीच अमान्य करणार नाही. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना नुकसान भरपाईपोटी आर्थिक मदतीच्या स्वरूपात जास्तीत जास्त पीकविमा मिळणे अपेक्षित आहे. पण त्यासाठी आपण सर्वांनी व्यवस्थित लक्ष देऊन पीक कापणी प्रयोगाबाबत अधिक सतर्क राहायला हवे असेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.
अशी असेल प्रक्रिया
सर्वांनीच ही प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी उदाहरणादाखल आपल्या भागाचे उंबरठा उत्पन्न १० क्विंटल गृहीत धरले (हे फक्त उदाहरण म्हणून घेतले आहे ) आणि शेतकऱ्यांच्या पदरात प्रत्यक्षात केवळ २ क्विंटल उत्पादन आले तर उंबरठा उत्पन्नाच्या तुलनेत एकूण उत्पादनाची तुट ८ क्विंटल इतकी गृहीत धरण्यात येणार आहे. म्हणजे ८०% नुकसान झाले असे समजण्यात येईल. त्यामुळे आपल्या जिल्ह्याला सोयाबीन पिकासाठी विमा संरक्षित हमी रक्कम (जास्तीत जास्त भरपाई) रु.५४,००० प्रति हेक्टर निश्चित करण्यात आलेली आहे. या रकमेच्या आधारे ८०% नुकसानीच्या प्रमाणात भरपाई काढली असता रु.४३,२०० प्रति हेक्टर इतकी येईल. यातील पीक कापणी प्रयोगाच्या माध्यमातून काढलेल्या ५०% भारांकणावर आधारित रु.२१,६०० तर तंत्रज्ञानाच्या आधारे काढलेल्या ५०% भारांकणावर उर्वरित रु.२१,६०० भरपाई मिळू शकते.







